लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा - भिक्खू पय्यानंद थेरो

      
      लातूर  : राजकारण, समाजकारण आणि शिक्षण यांचा त्रिवेणी संगम असलेले लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे खरे अर्थाने भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार होते. महाराष्ट्राच्या मातीत ज्या थोर पुरुषांनी सामाजिक समतेचा आणि न्यायाचा दीप प्रज्वलित केला, त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते राजर्षी शाहू महाराज यांचे. त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचले. त्यांच्याच कार्याला उजाळा देत भिक्खू पय्यानंद थेरो यांनी लातूरमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त  झालेल्या भव्य कार्यक्रमात ठामपणे मागणी केली की, “राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात यावे.”
       आजच्या दिवशी लातूर शहर साक्षीदार ठरले एका वैचारिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या मिरवणुकीचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या भव्य दिव्य मिरवणुकीने समतेचा झेंडा हाती घेतला होता. ज्येष्ठ नागरिक विचार मंच आणि शाक्य सिंह माता भिमाई सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ही मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.
       मिरवणूकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण आणि त्रिसरण-पंचशीलने झाली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. 
भिक्खू पय्यानंद थेरो पुढे बोलताना म्हणाले की, “शाहू महाराज हे केवळ एक शासक नव्हते, तर ते समाजमनाचे शिल्पकार होते. १९०२ मध्ये ५०% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे हे ओळखून त्यांनी मोफत शिक्षण, विद्यार्थी वसतीगृहे, रुग्णालये आणि सामाजिक संस्थांची उभारणी केली.”
        “आज भारतात अनेकांना भारतरत्न मिळाले, पण ज्यांनी लाखो-कोटींच्या जीवनात उजेड आणला अशा शाहू महाराजांचा अद्याप गौरव झालेला नाही. म्हणूनच आम्ही भारत सरकारकडे मागणी करतो की त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात यावा.”
तसेच, त्यांनी सुचवले की शाहू महाराजांची जयंती ही फक्त एक साजरी करणारी तारीख न राहता, सामाजिक प्रेरणेचा दिवस व्हावा. यासाठी एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हा कार्यक्रम केवळ एक मिरवणूक नव्हती, ती होती इतिहासाच्या न्यायासाठीचा जागर. लोकशाही, समता, शिक्षण, आरक्षण यांसाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केले त्या शाहू महाराजांच्या स्मृतींना एक सामूहिक वंदना होती.
       या प्रसंगी केशव कांबळे, सूर्यभान लातूर कर, त्र्यंबक कवठेकर, मोहन सोनकांबळे, राहुल शाक्यमुनी, मिलिंद धावारे ई. सह धम्म सेवक ग्रुपच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

*लामजना परिसरामध्ये रोडवर वयोवृद्धाला लुटणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या चार तासात मुद्दमालसह अटक. पोलीस ठाणे किल्लारीची कारवाई.*

       
       लातूर (पोअका) : 80 वर्षीय वृद्ध इसमाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या चोरणाऱ्या अनोळखी गुन्हेगारांना अवघ्या चार तासात निष्पन्न करून गुन्ह्यातील सोन्याची अंगठी व गुन्ह्यांत वापरलेली मोटारसायकल असे 80,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे किल्लारीची कामगिरी. दिनांक 14/06/2025 रोजी दुपारी 12:,30 वाजता पोलीस ठाणे किल्लारी हद्दीतील लामजना शिवारातील रोड वरून जाणाऱ्या एका 84 वर्षीय वृद्धाला "तू आमच्या अंगावर का थुकलास"असे म्हणून मारहाण करून त्याच्या जवळील 15 हजार रुपये रोख रक्कम व हातातील अंगठ्या अज्ञात तीन आरोपींनी मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे किल्लारी येथे अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
       पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे यांनी तात्काळ अधिकारी/अमलदारांचे पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान नमूद  पोलीस तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वयोवृद्धास मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे अंगठ्या  चोरलेल्या तीन आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी  सदरचा गुन्हा कबूल करून रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध इसमाला मारहाण करून बळजबरीने, त्याच्याकडील रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेऊन पळून गेल्याचे सांगितले.त्यांचेकडून सोन्याची अंगठी व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असे एकूण 80,000/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.1) वसीम रजाक शेख, वय 21 वर्ष, राहणार शिंदगाव तालुका रेनापुर जिल्हा लातूर. 2) इम्रान महताब शेख, वय 24 वर्ष, राहणार शिंदगाव तालुका रेनापुर. जिल्हा लातूर. 3)कौरव जनक लहाडे, वय 41 वर्ष, राहणार पाखरसांगवी, तालुका जिल्हा लातूर. असे असून नमूद गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास किल्लारी पोलीस करीत आहेत.
      कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शिंदे, ढोणे, पोलीस अंमलदार गणेश यादव, दत्ता जाधव, बालाजी लटुरे, सोमवंशी, रवी करके, आबा इंगळे यांनी केली केली असून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या चार तासात निष्पन्न करून ताब्यात घेतले आहे.

*आर्थिक गुन्हे शाखा, लातूर येथे कार्यरत पोलीस उपाधीक्षक राऊत यांना केंद्रिय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक बहाल.*

     
       लातूर (पोआका) : लातूर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक सुरेशकुमार राऊत हे पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना आक्टोबर 2021 मध्ये शिरूर घोडनदी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र वर भर दिवसा पाच दरोडेखोरांनी अग्निशस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 कोटी 50 लाख चा मुद्देमाल लुटला होता. 
         पोलीस उपाधीक्षक राऊत हे शिरूर घोडनदी पोलीस स्टेशनला कार्यरत असताना अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने गुन्ह्याचा तपास करत पाचही आरोपी दहा दिवसात अटक करून 100% रिकव्हरी करत एकूण 2 कोटी 50 लाख रुपयाचा मुद्देमाल, सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केले होते. 
         सदर तपासाची दखल घेत केंद्रिय गृहमंत्री यांचे केंद्रीय स्तरावरील त्याबद्दल पदक सण 2022 मध्ये राऊत यांना जाहीर झाले होते. त्याचे वितरण दि. 13/06/2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचलक श्रीमती रश्मी शुक्ला यांचे  हस्ते पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे पार पडले आहे.
         सुरेशकुमार राऊत यांना केंद्रीय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक मिळाल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी पोलीस उपाधीक्षक राऊत यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
         या वेळी  सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर,  विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,अप्पर पोलीस महासंचालक कारागृह सुहास वारके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे उपस्थित होते.

*महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज. भरण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत *

       लातूर, दि. १० (जिमाका): शिष्यवृत्तीसाठी सन २०२३-२४ साठी रि-अप्लाय आणि सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू झाले आहे. जिल्ह्यातील शासनमान्य, अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क फ्रिशीप, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेता येईल.
      ८ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क, विद्यापीठाद्वारे आकारले जाणारे इतर शुल्क आणि शैक्षणिक विभाग तसेच शासकीय यंत्रणांकडून घ्यावयाची मंजुरी याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि लिपिक कर्मचारी यांच्यावर आहे. महाविद्यालयांनी समान संधी केंद्रामार्फत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे.
      सर्व प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अर्ज अचूक भरून १५ जून २०२५ पूर्वी ऑनलाईन सादर करावेत. अर्ज प्रलंबित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य आर्थिक जबाबदारीस पात्र राहतील, असे लातूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी स्पष्ट केले.
*****

*वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*

     
       लातूर, दि. ०८ : आपल्या जिल्ह्याला हरित बनविण्याचा संकल्प करत यंदाच्या वटपौर्णिमेला प्रत्येक कुटुंबाने किमान दहा झाडे लावून पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. राज्य सरकारने दहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, लातूर जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेत महिलांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. १० जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त प्रत्येक कुटुंबातील महिलांनी आपल्या घराच्या अंगणात, परिसरात किंवा गावात किमान दहा झाडे लावून जिल्ह्याला हिरवेगार बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सामाजिक संस्था, ग्रामपंचायती आणि प्रत्येक व्यक्तीने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
    *‘अमृतवृक्ष’ ॲपवर नोंदवा वृक्षारोपणाची माहिती*
वटपौर्णिमेनिमित्त लावण्यात येणाऱ्या झाडांची माहिती ‘अमृतवृक्ष’ ॲपवर नोंदवण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांनी ॲप डाऊनलोड करून मोबाईल नंबर आणि ओटीपीद्वारे नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यावर ‘नया वृक्षारोपण’ पर्यायावर क्लिक करून लावलेल्या झाडांचे नाव, संख्या आणि फोटो अपलोड करता येतील. ॲप डाउनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.mrsac.amrutvruksh&hl=en_IN&pli=1 या लिंकचा वापर करावा.

*12 लाख 98 हजार रुपयांची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त. 02 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस ठाणे किल्लारी ची कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई.*

     
       लातूर (पोअका) : पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,यांचे मार्गदर्शनात  06 जून ते 07 जून मध्यरात्री दरम्यान संपूर्ण लातूर जिल्ह्यात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. 
       पोलीस ठाणे किल्लारी हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे हे कोंबिंग ऑपरेशन राबवीत असताना दिनांक 06 जून ते 07 जून रोजी मध्यरात्री एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी दोन इसम प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची पिकअप वाहतूक करीत आहेत अशी माहिती मिळाली. पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे यांनी पथकासह नाकाबंदी पॉईंटला अलर्ट करून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री, वाहतूक, साठवणूक साठी प्रतिबंधित केलेला 09 लाख 48 हजार रुपयांची एक्स्ट्रा सुगंधित तंबाखू, ओपल सुगंधी तंबाखू, रत्ना 3000 सुगंधी तंबाखू अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नावाच्या सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल चे वाहतूक करीत असताना  03 लाख 50 हजार रुपये किमतीचे पिकअप वाहन क्रमांक एम.एच.25 ए.जे.9044 सह ताब्यात घेण्यात आला.
       प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेले इसमा पैकी 1) दिनेश नवनाथ कांबळे,वय 40 वर्ष, राहणार दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव. 2) अशोक विठ्ठल कदम, वय 60 वर्ष, राहणार दहिफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव  याचे विरुद्ध पोलीस ठाणे किल्लारी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
       सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात,  पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार बालाजी लटुरे,येरनवाड, होमगार्ड राठोड, सरवदे, यांनी केली आहे.

*विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा**बाह्यरुग्ण विभाग ७ जून रोजी बंद राहणार.

      
       *८ जून रोजी नियमित वेळेप्रमाणे कामकाज सुरु राहणार*
      लातूर, दि. ०६ (जिमाका) :  बकरी ईदनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शनिवार, ७ जून २०२५ रोजी बंद राहील. तसेच रविवार, ०८ जून २०२५ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उद्धव माने यांनी कळविले आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा - भिक्खू पय्यानंद थेरो

              लातूर  : राजकारण, समाजकारण आणि शिक्षण यांचा त्रिवेणी संगम असलेले लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे खरे अर्थाने भारताच...

लोकप्रिय बातम्या