महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा प्रयत्न...
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीनंतर, त्याला महाविकास आघाडीकडून उत्तर देण्यात आलं. फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीची चिरफाड आणि पोलखोल सोप्या शब्दात करु असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं होतं. त्यासाठीच महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषद आयोजित केली.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील तर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित राहिले.
यावेळी अनिल परब यांनी फडणवीसांनी सादर केलेल्या प्रत्येक आकडेवारीवर स्पष्टीकरण दिलं. त्याशिवाय जयंत पाटील यांनी आर्थिक तरतुदीचे बारकावे नमूद केले. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी आमचं सरकार योग्य उपाययोजना करत असल्याचं नमूद केलं.
फडणवीसांची आकडेवारी आभासी असून, गोंधळ निर्माण करुन महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.